पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती व सोनाईचे संचालक प्रविण माने यांनी बुधवारी (दि.२३) शक्ति प्रदर्शन करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. नाराज झालेले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापुरातील नेते प्रवीण माने, भरत शहा आणि आप्पासाहेब जगदाळे यांनी बंडाचं निशाण फडकावलं, यातील प्रवीण माने यांनी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
अर्ज दाखल करण्यापूर्वी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना प्रवीण माने यांना समोरची गर्दी आणि गर्दीचं प्रेम पाहून हुंदका दाटून आला. आणि डोळ्यातून पाणी आले. समर्थकांच्या प्रेमापोटी माने भावनिक झाले. यावेळी व्यासपीठावरील त्यांचे वडील आणि सोनाईचे अध्यक्ष दशरथ माने आणि त्यांच्या मातोश्री यांनाही यावेळी रडू कोसळलं.
यावेळी प्रवीण माने म्हणाले की, "११ तारखेला आपला मेळावा झाल्यानंतर आम्ही विविध गावांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सर्वांनी एकमताने सांगितलं की, तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे. आपल्या समोर शरद पवारसाहेबांचा पक्ष आहे आणि दुसऱ्या बाजूला अजितदादांचाही पक्ष आहे. त्यांच्याकडे मोठमोठे नेते आहेत, संघटना आहे, गावोगावी पुढारी आहेत. आपल्याकडे फक्त तुमच्यासारखी सामान्य जनता आहे. टीका करून १० मतं मिळवण्यापेक्षा पाया पडून २० मतं मिळवू. आपण केलेल्या विकासकामांच्या जोरावर जनतेत जाऊन मते मागू. याच जनतेच्या ताकदीच्या जोरावर आपण निवडून येणार आहोत" असे प्रवीण माने यांनी म्हटलं आहे.
"लोकांनी सांगितलं आहे, आता जर माघार घेतली तर तुमचा नंबर डिलीट करून टाकू. आपल्या सर्वांच्या साक्षीने, आशीर्वादाने थोड्या वेळात उमेदवारी अर्ज भरणार आहे. लक्षात ठेवा मी एकटा आमदार होणार नाही, परिवर्तनाच्या लढाईत समोर बसलेला प्रत्येक माणूस आमदार आहे" असे प्रविण माने म्हणाले. या वेळी ॲड. बापुसाहेब साबळे, आझाद मुलाणी, रामदास बनसुडे, पुंडलिक धुमाळ, विलास घोळवे, रविराज भाळे, विजया कोकाटे, नवनाथ माने, पप्पु फडतरे, शरद चितारे, राजेंद्र भोळे, तानाजी धोत्रे, बाबासो चवरे आदींनी मनोगते व्यक्त केली.
....अन टचकन डोळ्यात पाणी आलं.
सकाळी कुलदैवतासह विविध देवांचे दर्शन घेण्यासाठी माने लवकर बाहेर पडले होते. घरातून बाहेर जाताना घरी कोणीही नव्हतं, पण जेव्हा दर्शन घेऊन आले तेव्हा त्यांची गाडीही गेटमधून आत जात नव्हती इतकी गर्दी जमली होती. लोकांचं हे प्रेम बघून डोळ्यांत टचकन पाणी आल्याचे माने यांनी सांगितले. यावेळी प्रविण माने काहीसे भावनिक झाले. त्यांनी हुंदका दाबला मात्र डोळ्यात पाणी आले होते.
इंदापुरात १९९५ ची पुनरावृत्ती होणार !
इंदापुर तालुक्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत जेव्हा जेव्हा तिरंगी लढत होते, तेव्हा तेव्हा अपक्ष उमेदवार निवडून येतो असा इतिहास आहे. २०२४ ला ही इंदापुरात तिरंगी होतेय आणि यंदाही १९९५ ची पुनरावृत्ती होणार असल्याचे मत प्रविण माने यांनी व्यक्त केले.
अफवांचा पाऊस, बाबीर बुवांचा गुलाल अन मानेंची शपथ
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी अनेकांना विचारणा केली, सर्वांनी सांगितलं फॉर्म भरा पण माघारी घेऊ नका. त्याचवेळी फॉर्म भरून परत माघारी घेणार असल्याची अफवा पसरवण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर प्रविण माने यांनी खिशातून बाबीर बुवांच्या गुलालाची पुडी काढून त्यातील गुलालाची शपथ घेतली. "बाबीर बुवांच्या गुलालाची शपथ घेऊन सांगतो, आज भरलेला अर्ज कोणत्याही परिस्थितीत माघारी घेणार नाही" अशी शपथ घेत प्रविण माने यांनी सगळ्या अफवांना मुठमाती दिली.
१९९५ ला हर्षवर्धन पाटलांना हाताला धरून सरकार बनवायला लावलं होतं : दशरथ माने
१९९५ ला काँग्रेसने महाराष्ट्रात चुकीची तिकिटं वाटप केली होती. तेव्हा इंदापुरातुन बंडखोरी करायला लावली होती. तेव्हा मी वेगवेगळ्या चिन्हांवर राज्यात ४४ अपक्ष आमदार निवडून आले होते. तेव्हा हर्षवर्धन पाटलांना हाताला धरून सरकार बनवायला लावलं होतं, असा गौप्यस्फोट दशरथ माने यांनी केला.
प्रविण भैय्या शिवाय सरकारच बनवता येणार नाही
प्रविण माने अपक्ष निवडून येणार आहेत, त्यांच्याशिवाय राज्यात सरकारच बनवता येणार नसल्याचे मत दशरथ माने यांनी व्यक्त केले.
©2026. All Rights Reserved.