विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात गुरुवारी (दि.११) महाविद्यालयीन स्तरावरील ‘आविष्कार’ संशोधन प्रकल्प स्पर्धेचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत २५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून ११० हून अधिक प्रकल्प सादर केले. पदवी, पदव्युत्तर आणि संशोधक स्तरावरील विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी, पर्यावरणपूरक व नाविन्यपूर्ण विषयांवर संशोधन मांडले.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, “संशोधनाचा प्रवास महाविद्यालयीन स्तरापासून सुरू होऊन पीएच.डी. व पोस्ट-डॉक्टरेटपर्यंत व्हावा. समाजातील समस्यांवर उपाय शोधणारे संशोधनच खरी उपयुक्तता सिद्ध करेल.”
स्पर्धेच्या समन्वयक व ARC प्रमुख डॉ. जयश्री बागवडे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेची पार्श्वभूमी व उद्दिष्टे उलगडून सांगितली. “ही स्पर्धा विद्यार्थ्यांना संशोधन आणि नवोपक्रमासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते. आंतरविद्याशाखीय संशोधनास चालना मिळून संशोधक व शास्त्रज्ञांशी संवादाची संधी मिळते,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. लालासाहेब काशिद, आयक्यूएसी समन्वयक प्रा. नीलिमा पवार, विभाग प्रमुख व प्राध्यापक, तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परीक्षक म्हणून प्रा. रामलिंग ताबे, डॉ. रोहिणी कोळेकर, डॉ. अर्चना कदम, डॉ. नेताजी करळे, डॉ. मंगेश कोळपकर व प्रा. क्रांती वाबळे यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व परीक्षक, मार्गदर्शक प्राध्यापक आणि सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
©2026. All Rights Reserved.