राजमाता जिजाऊ यांच्या जीवनकार्याचा अभ्यास केला तरी स्त्रीशक्ती किती शक्तिशाली, गतिमान आणि प्रभावशाली आहे याची प्रचिती येते, असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
शिवभक्त परिवार इंदापूर व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानाने महाविद्यालयाच्या प्रांगणात स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक निश्चित होणार, या दृढ संकल्पनेने राजमाता जिजाऊ यांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी मोलाचा वाटा उचलला. जिजाऊंच्या इतिहासातील संघर्षातून धैर्य, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण निर्माण होतात. महिलांना व मुलींना आयुष्यात संघर्षाच्या प्रसंगी राजमाता जिजाऊंची आठवण ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमास श्रीमंतराजे लखोजीराव जाधवराव यांचे थेट १६ वे वंशज श्रीमंतराजे अमरसिंह उदयसिंह जाधवराव तसेच इंदौरच्या होळकर घराण्याचे थेट १३ वे वंशज श्रीमंतराजे भूषणसिंह होळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी वीरपत्नी गौरी अशोक इंगवले यांना यावर्षीचा जिजाऊ पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच आजी-माजी सैनिक, एस.पी.आर.एफ. व सी.आर.पी.एफ. दलातील जवानांच्या माता व पत्नी यांचे शिवभक्त परिवार इंदापूर यांच्या वतीने जिजाऊ पूजन करण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक व पालकांचाही सन्मान करण्यात आला.
श्रीमंतराजे अमरसिंह उदयसिंह जाधवराव म्हणाले, “प्रत्येकाच्या घरी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावेत असे वाटते, मात्र त्याआधी प्रत्येक घरात राजमाता जिजाऊ जन्माला यायला हव्यात.”
श्रीमंतराजे भूषणसिंह होळकर म्हणाले, “महापुरुषांच्या बलिदानामुळेच आज आपण स्वतंत्र भारतात लोकशाही वातावरणात जगतो. राष्ट्र प्रथम या भावनेतून त्यांच्या विचारधारेचा अंगीकार करणे आवश्यक आहे.”
कामधेनू सेवा परिवारचे संस्थापक अध्यक्ष व समाजभूषण शिवव्याख्याते डॉ. लक्ष्मणराव आसबे यांनी राजमाता जिजाऊंच्या संघर्षाचे व स्वामी विवेकानंदांच्या युवकप्रेरक कार्याचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांना इतिहासातील घटनांमधून प्रेरणा घेऊन आजच्या काळात सकारात्मक कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी प्रास्ताविकात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचा आढावा घेत संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमास वीरपत्नी सुवर्णाताई डोईफोडे, वीरपत्नी हेमलता बाबुराव साबळे, उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे, डॉ. शिवाजी वीर, नगरसेवक अनिल पवार, माजी नगरसेवक कैलास कदम, दत्तात्रेय अनपट यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन फलफले सर व नितीन भोसले यांनी केले, तर आभार बापू जामदार यांनी मानले.
©2026. All Rights Reserved.