डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि त्यासोबत निर्माण होणारे सायबर धोके लक्षात घेता, विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती अभियान राबविण्यात आले.
दैनंदिन जीवनात मोबाईल, इंटरनेट आणि ऑनलाइन सेवांचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत विद्यार्थ्यांना या अभियानातून मार्गदर्शन करण्यात आले. अनोळखी फोन कॉल्स, संशयास्पद लिंक, बनावट वेबसाइट्स, ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून होणारी फसवणूक, ओटीपीची मागणी तसेच आर्थिक फसवणुकीचे विविध प्रकार यांची उदाहरणे देत विद्यार्थ्यांना संभाव्य धोके समजावून सांगण्यात आले.
यावेळी केवळ सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्यावर भर न देता डिजिटल जबाबदारी आणि सुरक्षित इंटरनेट वापर याविषयीही विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. वैयक्तिक माहिती, पासवर्ड आणि ओटीपी सुरक्षित ठेवणे, ऑनलाइन व्यवहार करताना सतर्क राहणे, संशयास्पद संदेशांची पडताळणी करणे तसेच शासकीय ऑनलाइन सेवांचा योग्य आणि सुरक्षित वापर करण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमादरम्यान सोहम कवितके आणि शंभूराजे मोरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सायबर सुरक्षेच्या विविध बाबी सोप्या आणि संवादात्मक पद्धतीने समजावून सांगितल्या. विद्यार्थ्यांनीही विविध प्रश्न विचारून ऑनलाइन सुरक्षिततेबाबत आपली उत्सुकता व्यक्त केली.
अभियानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना त्यासोबत डिजिटल सुरक्षिततेची जाणीव निर्माण करणे आवश्यक आहे, हा संदेश या उपक्रमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. शालेय स्तरावर सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
©2026. All Rights Reserved.