डिजिटल युगात वाढत्या सायबर धोक्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती आणि क्विक हील फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
या कराराअंतर्गत विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा, डिजिटल साक्षरता, ऑनलाइन गोपनीयता, सुरक्षित इंटरनेट वापर तसेच जबाबदार डिजिटल नागरिकत्व याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय प्रशिक्षण कार्यशाळा, तज्ज्ञांची व्याख्याने, विविध स्पर्धा, शिबिरे आणि जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा सुरक्षित व प्रभावी वापर करता यावा तसेच सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित व्हावीत, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल सुरक्षेविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
सामंजस्य करार कार्यक्रमास क्विक हील फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर, सहयोगी संचालक अजय शिर्के, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. रामराव घाडगे, विभागप्रमुख प्रा. महेश पवार तसेच समन्वयक प्रा. अक्षय भोसले उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
©2026. All Rights Reserved.