देशाचे नेते शरदचंद्र पवार यांचे नेतृत्व आपणा सर्वांना लाभले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली इंदापूरात व राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ता बदल हा निश्चित आहे. इंदापूर तालुक्यातील सध्याच्या राजकीय बदलाच्या लाटेमध्ये जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष व महाविकास आघाडीचे उमेदवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर (ता. इंदापूर) येथे शुक्रवारी (दि.२५) केले.
नीरा नरसिंहपूर येथे प्राचीनकालीन श्री लक्ष्मी-नृसिंह मंदिरात इंदापूर विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या निवडणुक प्रचाराचा शुभारंभ विधिवत पूजा व नारळ फोडून करण्यात आला, सदर प्रसंगी हर्षवर्धन पाटील बोलत होते. तत्पूर्वी नीरा नरसिंहपूर येथे कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटील यांचे जेसीबीमधून पुष्पवृष्टी करीत स्वागत केले.
ज्येष्ठ नेते शंकररावजी पाटील उर्फ भाऊ यांच्या सन १९५२ च्या पहिल्या निवडणुकीपासून श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर येथे नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करून, श्री लक्ष्मी-नृसिंहाचे आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे. इंदापूर तालुक्यातील विद्यमान लोकप्रतिनिधीची १० वर्षाची निष्क्रिय कारकीर्द संपवून, इंदापूर तालुक्याचा सर्व क्षेत्रामध्ये सर्वांगीण विकास करण्यासाठी लक्ष्मी-नृसिंहाचे आशीर्वाद आपण घेतलेले आहेत. इंदापूर तालुक्याच्या विकासाला १० वर्षे लागलेला ब्रेक हा आगामी ५ वर्षात भरून काढला जाईल, अशी ग्वाही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

सध्याच्या लोकप्रतिनिधीनी त्यांच्या काळात सहकारी संस्था, शिक्षण संस्था काढून रोजगार देण्याचे काम केले नाही. उलट गुण्या-गोविंदाने एकत्र राहत असलेले समाजा-समाजामध्ये स्वार्थासाठी तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. शासनाकडून विकास कामासाठी येणारा पैसा हा जनतेचा पैसा असतो. मात्र हा पैसा तालुक्यातील जनतेच्या विकासाऐवजी काही ठराविक लोकांच्या खिशात गेलेला दिसत आहे. सध्याच्या लोकप्रतिनिधी बनवा-बनवी थांबवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला साथ द्या, असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले.
खंडकरी शेतकऱ्यांना हर्षवर्धन पाटील यांच्यामुळेच जमिनी : ॲड. तेजसिंह पाटील
खंडकरी शेतकऱ्यांना पाटपाण्याच्या हक्कासह मिळालेल्या जमिनी ह्या राज्य मंत्रिमंडळात अनेक वर्ष मंत्री असलेले हर्षवर्धन पाटील यांच्यामुळेच मिळालेल्या आहेत, हे मी या मंदिरात श्रीलक्ष्मी-नृसिंहा समोर सांगत आहे. मी त्याकाळचा खंडकरी शेतकरी समितीचा सदस्य आहे, केवळ आणि केवळ हर्षवर्धन पाटील यांच्यामुळेच आपल्या तालुक्यातील सुमारे २ हजार २१५ एकर जमिनी खंडकरी शेतकऱ्यांना मिळू शकल्या, असे भाषणात अँड.तेजसिंह पाटील यांनी नमूद केले. राज्यातील कार्यक्षम व अभ्यासू नेतृत्व असलेले हर्षवर्धन पाटील यांना प्रचंड बहुमताने विधानसभेत पाठवा, असे आवाहनही अँड.तेजसिंह पाटील यांनी भाषणामध्ये केले.
©2026. All Rights Reserved.