इंदापूर तालुक्याला सहा हजार कोटी रुपयांचा विकास निधी अवघ्या तीन वर्षांत दिला असून आणखी विकास करण्यासाठी खोट्या प्रचाराला बळी न पडता रात्री बाराला जरी माझी गरज लागली तर मी तुमच्या पाठीशी आहे, हा शब्द देतो. २२ गावांचा पाणीप्रश्न सोडवायचा आहे, कुठून पाणी आणायचं, कसं पाणी आणायचं याची जबाबदारी माझी आहे, मात्र आ. दत्तात्रय भरणे यांना आपली सेवा करण्यासाठी विधानसभेत माझ्याबरोबर पाठवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

शुक्रवारी (दि. २५) इंदापूर येथे आ. भरणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. पवार म्हणाले, गेल्या दहा वर्षात आमदार भरणेंच्या नेतृत्त्वाखाली इंदापूरचा विकास आणि त्यापूर्वी हर्षवर्धन पाटलांच्या नेतृत्वाखाली झालेला विकास पाहा, तुम्हाला फरक दिसेल. इंदापुरातील संस्था टिकल्या पाहिजेत, संस्था तळहाताच्या फोडाप्रमाणे जपाव्या लागतात, इंदापूरकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भरणे यांची नेहमी धडपड असते. समोरची माणसे खोटारडी आहेत. लाडकी बहीण योजना आम्ही आणली. ही योजना बंद झाली म्हणून थापा मारतात.
आमदार दत्तात्रय भरणे, आमदार अमोल मिटकरी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष संजय सोनवणे, दीपक काटे, बाळासाहेब सरवदे यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले.
हर्षवर्धन पाटलांनी अनेक संस्था बंद पाडल्या
कर्मयोगी शंकरराव पाटील कारखान्यावर पाचशे कोटींचे कर्ज आहे. शंकरराव पाटील यांनी बिगर कर्ज कारखाना यांच्या ताब्यात दिला होता. यांनी तर लाखाचे १२ हजार केले, यांना निवडून देणार आहात का ? खरेदी-विक्री संघाची अवस्था, कळसचा वाईनरी प्रकल्प चालतोय का ? कर्मयोगी, निरा भीमा किती दर देतो ? माळेगाव, सोमेश्वर ३६३६ चा भाव देतात, अशी टीका पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर केली. ते म्हणाले, पाटील यांनी कारखान्याला ३०० कोटी केंद्राकडून गोड बोलून आणले. सोयीचे आले की गेले सोडून. लोकसभेला अदृश्य प्रचार केला, यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा. आम्हाला घरी जेवायला घातलं आणि विरोधकांचा अदृश्य प्रचार केला. इंदापूर अर्बन बँकेला दहा लाख रुपयांचा दंड झाला, काहीतरी चुकीचे केले म्हणून दंड झाला असेल. शिक्षण संस्थेची आता चौकशी लागली आहे, असे करून राजकारण होत नाही. लोकांची कामे करावी लागतात. शिरसोडीचा पूल ३९५ कोटी रुपये देऊन मंजूर केला आणि हे म्हणतात, त्याची काही गरज नव्हती. इंदापूरची बाजारपेठ त्यामुळे तर वाढणार आहे, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील विधानसभेचे उमेदवार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर कडाडून टीका केली.
©2026. All Rights Reserved.